औरंगाबाद- महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक हे शिवसेनेच्या इशार्यावर काम करीत असून, भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आज भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी चिकलठाणा विमानतळावर बीडला जाण्यासाठी आले होते. यावेळी स्थानिक भाजपच्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, काही पदाधिक़ार्यांनी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आयुक्त हे शिवसेना पदाधिकार्यांच्या दबावाखाली सेनेच्याच मंडळीची कामे करीत आहेत. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डात कामे करीत नाहीत, अशी तक्रार केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
तसेच शहरातील कचर्याची समस्या सुटावी यासाठी राज्य शासनाने 90 कोटी रुपयांचा निधी दिला. पण आयुक्त 9 महिन्यांत आयुक्त कचर्याचा प्रश्न सोडविण्यात असमर्थ ठरले आहे. शासनाकडून आलेल्या निधीतून यंत्रसामुग्री खरेदी केली. परंतु अद्यापर्यंत एकही यंत्र सुरू झालेले नाही. शासनाकडून आलेल्या निधीतून सेनेला जवळच्या मंडळींना टेंडर देऊन सेनेचा आर्थिक फायदा करीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले.
कचर्यापासून पीट तयार करण्यावर लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला. पण तयार पीटचा काही फायदा झाला नाही. याशिवाय रस्त्याच्या निविदा प्रक्रियेबाबतही पदाधिकार्यांनी आयुक्तांच्या पद्धतीवर मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली. मनपा आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर भाजपच्या पदाधिकार्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याने आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी भाजपचे स्थानिक आमदार अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, राज्य बालहक्क आयोगाचे प्रवीण घुगे,प्रवक्ते शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, नगरसेवक कचरु घोडके, माजी महापौर बापू घडामोडे, हेमंत खेडकर आदी सकाळी 9 वाजेपासून विमानतळावर उपस्थित होते.